ताराबाई

छत्रपती राजारामांची राणी


छत्रपती महाराणी ताराबाई भोसले (१६७५ - १७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्‍नी होत्या. या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाईअंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला.

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले
स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी सरकार
महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.
महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.
मराठा साम्राज्य
स्वराज्य सौदामिनी
अधिकारकाळ१६८९ - १७०० (महाराणी),
१७०० - १७०७ (छत्रपती)
अधिकारारोहणपट्टराणी, छत्रपती पदाभिषेक
राज्याभिषेक१२ फेब्रुवारी १६८९ (महाराणी),
३ मार्च १७०० (छत्रपती)
राजधानीजिंजी
पूर्ण नावताराबाई राजारामराजे भोसले
पदव्याछत्रपती, महाराणी
जन्म१६७५
तळबीड, महाराष्ट्र
मृत्यू९ डिसेंबर १७६१
सातारा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारीमहाराणी जानकीबाई,
छत्रपती राजाराम महाराज
उत्तराधिकारीमहाराणी सकवारबाई (द्वितीय),
छत्रपती सम्राट शाहू महाराज
वडीलहंबीरराव मोहिते
पतीछत्रपती राजाराम महाराज
संततीछत्रपती शिवाजी द्वितीय
राजघराणेभोसले
चलनहोन

राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.

ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.

दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

असे तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे वर्णन केले आहे.

ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.

जीवन

सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे वारसाहक्काने जायला हवे होते. त्यावेळी शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या लढाईत बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली.[१] ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहूला मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे , पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. परंतु १७१४ मध्ये राजारामची दुसरी विधवा, राजसाबाई यांनी ताराबाई पदच्युत करून स्वतःचा मुलगा संभाजी (दुसरा) याला गादीवर बसवले. ताराबाई आणि तिच्या मुलाला दुसऱ्या संभाजीने कैद केले. शिवाजी (दुसरा) १७२६ मध्ये मरण पावला. ताराबाई नंतर १७३० मध्ये छत्रपती शाहूंशी समेट करून कोणताही राजकीय अधिकार न ठेवता सातारा येथे राहायला गेल्या. [२]

राजकीय परिस्थिती

सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. ३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे ,पिलाजी गोळे, गिरजोजी यादव आदी मातबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले, सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले.[३] मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले, व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.[४]

राजाराम

सन १७०७ साली औरंगजेबाचा अहमदनगरजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला. महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.

पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकिर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

बालाजी बाजीराव पेशव्याशी संघर्ष

पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या.१७४० च्या दशकात शाहूच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत ताराबाईंनी त्यांच्याकडे एक मूल आणले: राजाराम दुसरा (ज्याला रामराजा देखील म्हटले जाते). तिने मुलाला आपला नातू आणि शिवाजी महाराजांचा थेट वंशज म्हणून सादर केले तिने असा दावा केला की त्याच्या संरक्षणासाठी तो जन्मल्यानंतर लपविला गेला होता आणि एका राजपूत सैनिकाच्या पत्नीने त्याला वाढवले ​​होते.[५] ह्या मुलाला शाहूने दत्तक घेतले कारण त्याला स्वतःचा मुलगा नव्हता..१७४९ मध्ये शाहूच्या मृत्यूनंतर, राजाराम द्वितीय त्याच्यानंतर छत्रपती झाला. जेव्हा पेशवा बालाजी बाजीराव मुघल सरहद्दीवर रवाना झाले तेव्हा ताराबाईंनी राजाराम द्वितीयला बालाजी बाजीराव यांना पेशव्याच्या पदावरून काढून टाकण्यास उद्युक्त केले. जेव्हा राजाराम यांनी नकार दिला, तेव्हा 24 नोव्हेंबर 1750 रोजी तिने त्याला सातारा येथील अंधारकोठडीत कैद केले. तिने दावा केला की तो एक ढोंगी आहे आणि तिने शाहूसमोर राजाराम आपला आपला नातू म्हणून खोटी साक्ष दिली होती..[६] यापूर्वी, ऑक्टोबर १ 1750० मध्ये ताराबाईंनी पेशवाविरोधी, उमाबाई दाभाडे यांची भेट घेतली होती. उमाबाईंनी ताराबाईंच्या समर्थनार्थ दामाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात १५,००० सैन्य पाठवले. गायकवाड यांनी साताऱ्याच्या उत्तरेस निंब येथे एका लहानशा गावात पेशवाईचा निष्ठावंत त्र्यंबकराव पुरंदरे यांच्या नेतृत्वात असलेल्या २०,००० बलाढ्य सैन्याचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी साताऱ्याला कूच केले, जिथे त्यांचे ताराबाईंनी स्वागत केले. तथापि, त्र्यंबकरावांनी पुन्हा आपले सैन्य स्थापन केले आणि १ मार्च रोजी वेण्णा नदीच्या काठावर असलेल्या गायकवाडच्या सैन्यावर हल्ला केला. या युद्धात गायकवाड यांचा पराभव झाला व त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले..[७]

दरम्यान, पेशवे मोगल सीमेवरून परत आले आणि २४ एप्रिल रोजी सातारा येथे पोहोचले. त्यांनी ताराबाईच्या सैन्यांचा पराभव करीत सातारा येथील यवतेश्वरच्या चौकीवर हल्ला केला. त्यांनी सातारा किल्ला घेरला, आणि ताराबाईंना छत्रपती राजारामला सोडण्यास सांगितले. त्यावेळी राजारामाची शारीरिक व मानसिक स्थिती खूपच खालावली होती. ताराबाईंनी नकार दिला आणि पेशवे पुण्याला निघून गेले कारण सुसज्ज आणि मजबूत सातारा किल्ला घेण्यास सोपा होणार नव्हता. दरम्यान, पेशवाईच्या माणसांनी दामाजी गायकवाड, उमाबाई दाभाडे आणि त्यांच्या नातेवाईकांना अटक केली.

त्याचवेळी सातारा सैन्याच्या तुकडीने तिच्याविरुद्ध बंड केले. तिने बंडखोरांचे नेते आनंदराव जाधव यांचा शिरच्छेद केला. तथापि, तिला समजले की ती पेशव्यांविरुद्ध लढू शकणार नाही आणि शांततेच्या करारासाठी पुण्यात भेटण्याची तयारी दर्शविली. पेशव्यांचा प्रतिस्पर्धी जानोजी भोसले हा पुष्कळ सैन्य घेऊन पुण्याजवळ होता आणि त्यामुळे पेशव्यानी तिचे संरक्षण करण्याचे मान्य केले. पुण्यात पेशवे तिच्याशी आदराने वागले आणि, काही नाखुषीनंतर ताराबाईंनी पेशव्याचे श्रेष्ठत्व स्वीकारले. पेशवे यांना नापसंत करणारे सरदार जाधव यांना काढून टाकण्याचे तिने मान्य केले. त्या बदल्यात पेशवाईने तिला माफ केले. १ सप्टेंबर १७५२ रोजी दोघांनी परस्पर शांततेचे वचन देऊन जेजुरीतील खंडोबा मंदिरात शपथ घेतली. या शपथविधीत ताराबाईंनीही शपथ घेतली की राजाराम दुसरा तिचा नातू नाही. तथापि, पेशव्यांनी राजारामला एक शक्तीहीन छत्रपती म्हणून कायम ठेवले.[५][२]

साहित्यात ताराबाई

कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर, डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. सदाशिव शिवदे अशा अनेक लेखकांनी महाराणी ताराबाईंवर ग्रंथ लिहिले आहेत.

हे सुद्धा पहा

पुस्तके

  • महाराणी ताराऊसाहेब (अशोकराव शिंदे सरकार)
  • क्षेत्राणी शिवस्नुषा ताराराणी (रमेश शांतिनाथ भिवरे)
  • मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई (डॉ. जयसिंगराव पवार)
  • रणरागिणी ताराराणी (सदाशिव शिवदे)
  • भद्रकाली ताराराणी (डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर)
  • Tara Bai and her times ( डॉ ब्रिज किशोर)
  • छत्रपती राजाराम ताराराणी (सदाशिव शिवदे)
  • रामराणी ताराबाई (नयनतारा देसाई)

संदर्भ

बाह्य दुवे