भारतरत्‍न

(भारतरत्न या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.[ संदर्भ हवा ]

भारतरत्‍न
पुरस्कार माहिती
प्रकारनागरी
वर्गसामान्य
स्थापित१९५४
प्रथम पुरस्कार वर्ष१९५४
एकूण सन्मानित>४५
सन्मानकर्तेभारत सरकार
रोख पुरस्कारशून्य
सुलटपिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व
देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा श्ब्द
उलटभारताचे राजचिन्ह
प्रथम पुरस्कारविजेते* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.

इ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती.[ संदर्भ हवा ] परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

प्राथमिक वैशिष्ट्ये

पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :

  • पुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न’ संबोधले जाईल.
  • हे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीत कोरलेले असेल. पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल.
  • हे पदक ०.२५ इंच रुंदीच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल.
  • हे पदक राष्ट्रपतींच्या हस्तेच घातले जाईल.
  • ‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल.
  • एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहील.
  • जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.
  • प्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुनर्नोंदणी करण्याची प्रक्रिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

नवीन बदल

राष्ट्रपतींनी दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :

  • राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रेसहित पुरस्कार प्रदान केला जाईल. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल. त्याची लांबा २.३१२५ इंच, रुंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील. हे पदक काशाचे बनवले जाईल. याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल. मागील बाजूवर राजचिन्ह कोरले जाईल. सूर्य व घेरा प्लॅटिनमचा असेल. अक्षरांवर चांदीचा मुलामा असेल.
  • २६ जानेवारी १९५७ च्या अधिसूचनेनुसार हे पदक चमकदार काशामध्ये बदलले.

मेडलची आजची स्थिती

‘भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’कोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.

भारतरत्न विजेत्यांच्या सुविधा

‘भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात :

  • ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
  • संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.
  • भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी.
  • भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
  • पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.
  • आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.
  • माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.

पुरस्काराचे स्वरूप

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते.

'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.हा पुरस्कार मिळणे खूप मानाचे समजले जाते.

सन्मानित व्यक्तींची यादी

क्रमांकविजेतेचित्रजन्म - मृत्यूराज्यपुरस्कृत वर्षक्षेत्र
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)तामिळनाडू१९५४भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ. तत्त्वज्ञ राधाकृष्णन यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२-६२) आणि दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) म्हणून काम केले. १९६२ पासून, ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो.
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२)तामिळनाडू१९५४भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल. "विद्वान एमेरिटस" म्हणून ओळखले जाणारे, राजगोपालाचारी हे भारताचे गव्हर्नर-जनरल (१९४८-५०) होते. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते. राजाजी हे पश्चिम बंगालचे पहिले राज्यपाल होते. त्यांनी १९५२ ते १९५४ दरम्यान दोन वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. ते भारतीय राजकीय पक्ष स्वतंत्र पक्षाचे संस्थापक आहेत.
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०)तामिळनाडू१९५४प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. प्रकाशाचे विखुरणे आणि प्रभावाचा शोध यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जाणारे, "रामन स्कॅटरिंग" या नावाने ओळखले जाणारे, रामन यांनी प्रामुख्याने अणु भौतिकशास्त्र आणि विद्युत चुंबकत्व या क्षेत्रात काम केले आणि त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८)उत्तर प्रदेश१९५५भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२)कर्नाटक१९५५पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर'चे संस्थापक
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४)१९५५भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१)१९५७भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री
धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२)१९५८समाजसुधारक, शिक्षणप्रसारक
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२)१९६१पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक
१०पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२)१९६१भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक
११डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)१९६२भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती
१२डॉ. झाकिर हुसेन (१८९७-१९६९)१९६३भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती
१३महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे(१८८०-१९७२)१९६३शिक्षणप्रसारक
१४लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६)१९६६भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान
१५इंदिरा गांधी (१९१७-१९८४)१९७१भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
१६.वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०)१९७५कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती
१७.के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५)१९७६भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
१८मदर तेरेसा (१९१०-१९९७)१९८०ख्रिश्चन मिशनरीची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
१९.आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२)१९८३भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक
२०.खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८)१९८७भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
२१.एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७)१९८८चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
२२.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६)१९९०भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ व भारताचे पहिले कायदामंत्री
२३.नेल्सन मंडेला (१९१८-२०१३)१९९०वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
२४.राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१)१९९१भारताचे सातवे पंतप्रधान
२५.सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०)१९९१भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
२६.मोरारजी देसाई (१८९६-१९९५)१९९१भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान
२७.मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८)१९९२भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
२८.जे.आर.डी. टाटा (१९०४-१९९३)१९९२उद्योजक
२९.सत्यजित रे (१९२२-१९९२)१९९२बंगाली चित्रपट निर्माते
३०.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ( १९३१-२०१५)१९९७शास्त्रज्ञ व भारताचे ११वे राष्ट्रपती
३१.गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८)१९९७भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान
३२.अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर) (१९०६-१९९५)१९९७भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
३३.एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९१६-२००४)१९९८कर्नाटक शैलीतील गायिका
३४.चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००)१९९८भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री
३५.जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (१९०२-१९७९)१९९९भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
३६.रवी शंकर (१९२०)-२०१२)१९९९प्रसिद्ध सितारवादक
३७.अमर्त्य सेन (१९३३ - हयात)१९९९प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
३८.गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) (१८९०-१९५०)१९९९भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री
३९.लता मंगेशकर (१९२९-२०२२)२००१पार्श्वगायिका
४०.बिसमिल्ला खान (१९१६-२००६)२००१शहनाईवादक
४१.भीमसेन जोशी (१९२२-२०११)२००८शास्त्रीय गायक
४२.सी.एन.आर.राव[१][२] (१९३४ - हयात)२०१४
शास्त्रज्ञ
४३.सचिन तेंडुलकर[१][२] (१९७३ - हयात)२०१४
क्रिकेट खेळाडू
४४.मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)[१][२] (१८६१ - १९४६)२०१५
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक
४५.अटलबिहारी वाजपेयी[१][२] (१९२४ - २०१८)२०१५
भारताचे पंतप्रधान
४६.नानाजी देशमुख (१९१६ - २०१०)२०१९सामाजिक कार्यकर्ता
४७.भूपेन हजारिका (१९२६ - २०११)२०१९गायक
४८.प्रणव मुखर्जी (१९३५ - २०२०)२०१९भारताचे १३वे राष्ट्रपती
४९.कर्पूरी ठाकुर (१९२४-१९८८)२०२४बिहारचे ११वे मुखमंत्री
५०.लालकृष्ण अडवाणी (१९२७-)२०२४माजी उप-पंतप्रधान.
५१.पी.व्ही. नरसिंहराव (१९२१-२००४)२०२४माजी पंतप्रधान.
५२.चौधरी चरण सिंह (१९०२-१९८७)२०२४माजी पंतप्रधान.
५३.एम.एस. स्वामीनाथन (१९२५-२०२३)२०२४भारतीय कृषी शास्त्रज्ञ

संदर्भ