गुलझारीलाल नंदा (४ जुलै १८९८ - - १५ जानेवारी १९९८) एक भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते जे कामगार प्रश्नांमध्ये तज्ञ होते. १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर दोन अल्प कालावधीसाठी ते भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. सत्ताधारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाने नवीन पंतप्रधान निवडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुदती संपुष्टात आल्या. १९९७ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.[१][२]
पूर्वीचे जीवन
ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथे नंदांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी एका पंजाबी हिंदू(नाई) कुटुंबात झाला. १९४७ मध्ये ब्रिटीश भारताचे भारत आणि पाकिस्तानमध्ये विभाजन झाल्यानंतर सियालकोट हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग बनला. नंदा यांचे शिक्षण लाहोर, अमृतसर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले.
त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (१९२०-२१) कामगार समस्येवर संशोधन अभ्यासक म्हणून काम केले आणि १९२१ मध्ये ते मुंबई मधील नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्याच वर्षी त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध भारतीय असहकार चळवळीत भाग घेतला. १९२२ ते १९४६ पर्यंत अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे सचिव म्हणुन ते कार्यरत होते. १९३२ मध्ये, आणि १९४२ ते १९४४ पर्यंत पुन्हा, त्यांना सत्याग्रहा साठी तुरूंगात डांबण्यात आले.
त्यानी लक्ष्मीशी लग्न केले, व त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती.[३]
राजकीय कारकीर्द
१९३७ मध्ये नंदा मुंबई विधानसभेवर निवडून गेले आणि १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी मुंबई सरकारचे संसदीय सचिव (कामगार व उत्पादन शुल्क) या पदावर काम केले. १९४६-५० दरम्यान त्यांनी मुंबई सरकारचे कामगार मंत्री म्हणून काम पाहिले. राज्य विधानसभेत कामगार विवाद विधेयक यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी कस्तुरबा मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांनी हिंदुस्तान मजदूर सेवक संघ (भारतीय कामगार कल्याण संघटना)चे सचिव आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राष्ट्रीय नियोजन समितीचे सदस्य होते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे आयोजन करण्यात त्यांचे मुख्य योगदान होते, आणि नंतर ते अध्यक्ष झाले.
मार्च १९५० मध्ये नंदा भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. सप्टेंबर १९५१ मध्ये त्यांची भारत सरकारमध्ये नियोजनमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्याला पाटबंधारे व वीज खात्यांचा पदभारही देण्यात आला होता. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते मुंबईहून लोकसभेवर निवडून गेले आणि पुन्हा नियोजन, पाटबंधारे आणि उर्जामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५५ मध्ये सिंगापूर येथे आयोजित योजना सल्लागार समिती आणि १९५९ मध्ये जिनिव्हा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
नंदा प्रत्येकी तेरा दिवसांसाठी दोनदा भारताचे पंतप्रधान होते: १९६४ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आणि दुसऱ्यांदा १९६६ मध्ये पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर. त्यांचे दोन्ही कार्यकाळ अप्रचलित होते, परंतु ते १९६२ च्या चीनशी युद्धानंतर नेहरूंच्या मृत्यूनंतर आणि १९६५ च्या पाकिस्तानशी युद्धानंतर शास्त्रींच्या निधनानंतरच्या संवेदनशील वेळी आले.[४] १५ जानेवारी १९९८ रोजी ९९ व्या वर्षी नंदा यांचे निधन झाले.[५]