मुहम्मद बिन कासिम

(मोहम्मद बिन कासीम या पानावरून पुनर्निर्देशित)

मुहम्मद बिन कासिम (अरबी:عماد الدين محمد بن القاسم الثقفي‎‎; अंदाजे ६९५:तैफ, सौदी अरेबिया - इ.स. ७१५) हा उमायद खिलाफतीचा सेनापती होता. याने आठव्या शतकाच्या सुरुवातीस इराणमार्गे भारतावर चाल केली व सिंधसह मुलतानपंजाबमधील सिंधू नदीकाठचा प्रदेश काबीज केला.

मुहम्मद त्यावेळचा इराकचा जहागिरदार अल हज्जाजचा पुतण्या होता व त्याच्या हाताखाली त्याने प्रशिक्षण घेतले. इ.स. ७१२मध्ये अरोरच्या लढाईत सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केल्यावर याने आसपासच्या प्रदेशांतील राजांना आपल्याला शरण येण्याचा किंवा लढण्याचा इशारा दिला. शरण आलेल्या किंवा तह केलेल्या राज्यांकडून खंडणी घेतली व त्याच्याविरुद्ध लढून हरलेल्या राज्यांचे त्याच्या अरब फौजेने अतोनात नुकसान केले व तेथील बायका व मुलांवर अत्याचार करून त्यांना गुलाम बनविले व त्यातील एक पंचमांश भाग अरबस्तानात पाठवून दिले.]].[१]

तिकडे इराकमध्ये अल हज्जाज आणि दमास्कसमध्ये खलीफा अल वालिद पहिल्याच्या मृत्यूनंतर सुलेमान अब्द अल-मलिक खलीफा झाला. त्याने मुहम्मद बिन कासीमला दमास्कसला बोलावून घेतले. अल हज्जाजचा शत्रू असलेल्या सुलेमानने मुहम्मदला लगेचच कैदेत घातले. मुहम्मदच्या मृत्यूबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका मतानुसार अल हज्जाजच्या सांगण्यावरून मुहम्मदने सुलेमानहा मुहम्मदने जिंकलेल्या प्रदेशांचा खलीफा नसल्याचे जाहीर केले होते. याचा सूड म्हणून सुलेमानने कासिमला हालहाल करून ठार मारविले.[२][३] दुसरे मत चाचनामा या ग्रंथात आहे. त्यानुसार मुहम्मदने दाहिरच्या दोन मुली खलीफाला नजराणा म्हणून पाठविल्या होत्या. त्यांनी खलीफाला असे पटविले की मुहम्मदने त्याआधी खलीफाचा अपमान करण्यासाठी त्यांच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून नंतर पाठविले होते. हे ऐकून चवताळलेल्या खलीफाने मुहम्मदला असेल तेथून कातड्याच्या पिशवीत[४] बांधून पाठविण्याचे फर्मान काढले. त्यात गुदमरून मुहम्मदचा मृत्यू झाला.[५] नंतर दाहिरच्या मुली खोटे बोलले असल्याचे कळल्यावर सुलेमानने त्यांना भिंतीत चिणून ठार केले.[६][२][७]

अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यू पावलेल्या मुहम्मद बिन कासिमने अरबस्तानातून भारतावर पहिली सफल स्वारी केली होती. जरी त्यानंतर काही वर्षांतच भारतातील हिंदू राजांनी अरबांना हाकलून लावले असले तरी भारतावरील मुसलमान आक्रमणांचा पायंडा मुहम्मद बिन कासिमपासून पडला.

संदर्भ आणि नोंदी