महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.[१] राज्यात ३ मे २०२० पर्यंत १२,९७४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २,११५ जण पूर्ण बरे झालेले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी ४% लोकांचा मृत्यू झाला आहे.[२][३]
महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी | |
---|---|
कोव्हिड-१९ च्या संसर्गाचे निदान झालेल्या रुग्ण संख्येचा जिल्हावार नकाशा | |
कोव्हिड-१९मुळे मृत संख्येचा जिल्हावार नकाशा | |
रोगाचे नाव | कोव्हिड-१९ |
विषाणू प्रकार | सार्स-कोव्ह-२ |
स्थान | महाराष्ट्र, भारत |
पहिला उद्रेक | वुहान, चीन |
पहिला रुग्ण | पुणे |
आगमनाचा दिनांक | ९ मार्च २०२० |
बाधीत रुग्ण | ५,३५,६०१ |
सक्रिय रुग्ण | ४,६७,९४९ |
बरे झालेले रुग्ण | ४९,३४६ (जून १३, इ.स. २०२०) |
मृत्यू | १८,३०६ (ऑगस्ट ११, इ.स. २०२०) |
बाधित जिल्हे | सर्व ३६ जिल्हे |
अधिकृत वेबसाईट | |
arogya.maharashtra.gov.in COVID-19 Monitoring Dashboard, Government of Maharashtra |
राज्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर - मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठीच्या १० 'हॉटस्पॉट' पैकी एक बनला आहे.[४] १४ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात २३% रुग्ण असून एकूण मृत्यूंपैकी ४६% मृत्यू राज्यात झाले आहेत.[५]
या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्च २०२० पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या.[६] १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. राज्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या.[७] २३ मार्चला जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. देशातील विमानतळे बंद करण्याचा संबंधित अधिकार पंतप्रधानांना असल्याने सर्व विमानतळे त्वरित बंद करण्याची विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.[८]
महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. नागरिकांची उपासमार होऊ नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय झाला.[९] २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवाही बंद करण्यात आली.[१०]
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये या साठी पोलीस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे यांनी व्यक्त केले.[११]
इतिहास
चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी वुहान शहरात संक्रमक कोरोना व्हायरस आढळल्याची पुष्टी दिली. ३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ह्या विषाणूचा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे जाहीर केले. ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले.[१२] २९ जानेवारी २०२० रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला.[१३] महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये ९ मार्च २०२० रोजी आढळून आला.[१४] महाराष्ट्रातील पहिला बळी १६ मार्च २०२० रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.[१५]
संपर्क मागोवा
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि पुढील संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी संपर्कांचा मागोवा घेतला जातो. क्षयरोग, लस-प्रतिबंधक गोवर इत्यादी संक्रमण, लैंगिक संक्रमित संक्रमण, एचआयव्ही, रक्त-संसर्गजन्य संक्रमण, काही गंभीर जिवाणू संक्रमण यांत संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा मागोवा घेतला जातो. २०२० मधील कोरोना विषाणू उद्रेकात महाराष्ट्रातील संक्रमित व्यक्तीच्या संपर्काचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांना व प्रशासकीय यंत्रणेला फार मेहनत घ्यावी लागत आहे.[१६] १० एप्रिल २०२० रोजी, ॲपल आणि गुगल ह्या स्मार्टफोन सॉफ्टवेअरच्या निर्मात्यांनी कोरोनाव्हायरस ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची घोषणा केली.[१७]
निदान
८ एप्रिल रोजी वकील शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खासगी प्रयोगशाळेत होत असलेल्या करोनाच्या चाचणी संदर्भातील याचिकेवरील सुनावणी झाली व सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा, मग त्या सरकारी असोत की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी असा निर्देश केंद्र सरकारला दिला व सदरच्या आदेशाच्या तात्काळ अंमलबजवणीच्या सूचनाही केंद्र सरकारला दिल्या.[१८] १३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिला दिलेला आपलाच आदेश बदलला, नव्या आदेशानुसार फक्त दारिद्य्ररेषेखालील, ईडब्ल्यूएस आणि आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी असलेल्यांनाच ही चाचणी मोफत असेल असा निकाल दिला.[१९] प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे घरबसल्या ओळखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणीसाठीचे टूल बनविण्यात आले आले आहे.[२०]
महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या | |
चाचण्यांची एकूण संख्या | ६७,४६८ |
---|---|
पॉझिटिव्ह | ३,६४८ |
निगेटीव्ह | ६३,४७६ |
१८ एप्रिलच्या माहितीनुसार[२१] |
प्रयोगशाळा
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकात कोरोनाव्हायरस रोग २०१९च्या निदानासाठी १९ शासकीय व १८ खासगी अशा एकूण राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थाद्वारा मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत.[२२]
चाचणीचे प्रकार
१७ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सार्स-सीओव्ही-२ साठी अनेक आरएनए चाचणीचे मानदंड प्रकाशित केले व रिअल-टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन (आरटीपीसीआर) ही चाचणी कोरोना लागण झाल्याचे पुष्टीकरण करण्यासाठी प्रमाणित केली.[२३]
७ एप्रिल २०२० रोजी भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थाने एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या सरकारी कंपनीने विकसित केलेल्या रॅपिड अँटीबॉडी ब्लड टेस्ट किटला प्राथमिक चाचणी म्हणून मान्यता दिली. १५ ते २० मिनिटांत होणाऱ्या या चाचणीच्या मदतीने कोरोना प्रादुर्भाव कोणत्या भागात वाढत आहे याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अँटीबॉडी रक्त चाचणीत रुग्ण संक्रमित असल्याचे आढळल्यास त्या रुग्णाची जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली आरटीपीसीआर चाचणी होणार आहे.[२४]
- कोरोना चाचणीसाठी नाकातून नमुने घेतानाचे चित्र
- कोरोना चाचणीसाठी घशातून नमुने घेतानाचे चित्र
- रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (आरटीपीसीआर) ही चाचणी करणारे मशीन
कालावधी
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार साथीचे रोग नियंत्रित केले जाऊ शकतात, पर्ंतु या उद्रेकातील सर्वोच्च आणि अंतिम कालावधी अनिश्चित आहे आणि स्थानानुसार वेगवेगळा असू शकतो.[२५] चिनी सरकारचे ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागार झोंग नानशान यांच्या म्हणण्यानुसार सर्व देशांनी एकत्रितपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या उपाययोजनांबाबतच्या सल्ल्याचे पालन केल्यास विषाणूचा प्रसार जून २०२० पर्यंत संपेल.[२६] ज्येष्ठ महामारीविज्ञानी व गणिती जीवशास्त्रज्ञ नील मॉरिस फर्ग्युसन यांच्या नेतृत्वात लंडनच्या इम्पीरियल कॉलेजने केलेल्या अभ्यासानुसार लस उपलब्ध होईपर्यंत (संभाव्यतः १८ महिने किंवा अधिक) शारीरिक अंतर आणि इतर उपाययोजना आवश्यक असतील.[२७]
उपाययोजना
"कोरोना व्हायरस हे एक जागतिक युद्ध आहे. या युद्धाचा सामना करताना आपण जनता म्हणून सरकारला सहकार्य करत आहात.
घाबरू नका, घाबरून युद्ध जिंकता येत नाही. आता मागे हटून चालणार नाही.
आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरू नये, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो.
पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणे ही आपली जबाबदारी आहे.
यंत्रणा सांभाळणारी सुद्धा माणसंच आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका!"
"हे संकट जात-पात-धर्म ओळखत नाही. संकट हे संकट असते, आपत्ती ही आपत्ती असते, म्हणून या संकटास सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला तर आपल्याकडे हे संकट काहीसुद्धा वेडेवाकडे करू शकणार नाही."
विलगीकरण
करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी संसर्गजन्य प्रदेशांतून प्रवास करून आलेल्या अथवा संसर्ग झाला असल्याचे निदान झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जाते.
कृती दल
१३ एप्रिल २०२० रोजी नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांच्या समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करणे, गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात विशेषज्ञ व अन्य आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमकी किती गरज आहे याचा अभ्यास करणे तसेच या रुग्णांवरील औषधोपचाराची कार्यपद्धती ठरवणे आणि अन्य रुग्णालयातील गंभीर झालेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णांलयात कशाप्रकारे हलवले जावे याची कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे. डॉ. झहीर उडवाडिया (हिंदुजा रुग्णालय), डॉ. साहिल जवरे (लीलावती रुग्णालय), डॉ. केदार तोरस्कर (वाॅकहार्ट रुग्णालय), डॉ. राहुल पंडित (फोर्टिस रुग्णालय), डॉ. एन. डी. कर्णिक (सायन रुग्णालय), डॉ. झहिर विरानी (पी.ए.के. रुग्णालय), डॉ. प्रवीण बांगर (केईएम रुग्णालय), डॉ. ओम श्रीवास्तव (कस्तुरबा रुग्णालय) हे या समितीचे सदस्य आहेत.[२९]
संचारबंदीला प्रतिसाद
संचारबंदीला बहुतांश लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, परंतु समाजातील काही नागरीक सरकारी नियमांचे व साथीच्या रोगाचे गांभीर्य न समजून नियमांचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसले.[३०] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद केले असताना संचारबंदीचे सर्व नियम मोडत भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सहपत्निक महापूजा केली. यांच्याविरुद्ध तसेच विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे आणखी एक सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी शिंदे विरुद्ध पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि २६९, २७०, १८८ तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ (ब), ३७ (३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.[३१]
" मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं!"
" कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच
स्थानिक प्रशासन वारंवार करत असलेल्या सूचना लोक गंभीरतेने घेताना दिसत नाहीत.
लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं असे स्पष्ट निर्देश दिलेले
असतानाही या साध्या सूचना लोक पाळताना दिसत नाहीत.
त्यामुळे काही नागरिकांमुळे समाजाची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे."
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात करोनाचे दोन संशयीत रुग्णांवर नियमितपणे उपचारही सुरू असताना केवळ आमदारांचा फोन उचलला नाही असा आरोप करून आमदार मौलाना मुफ्ती यांनी रुग्णालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप केला व त्यांच्यासोबत आलेले २० ते २५ कार्यकर्ते थेट वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात शिरले. तेथे आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यात आली. रुग्ण सेवेत व्यस्त असलेल्या डॉक्टरांना धक्काबुक्की केली.[३२][३३]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संपूर्ण आर्वी शहरात सायकल रिक्षावर लाऊडस्पीकर लावून आमदार दादाराव केचे यांच्यातर्फे धान्यवाटप होणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली. मोफत धान्य घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी अनेक गरीब लोकांनी झुंबड केली. या कार्यक्रमाची कुठलीही शासकीय परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेली नव्हती. स्थानिक नागरिकाने केलेल्या फोनमुळे याची माहिती पोलिसांना झाली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली.[३४]
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेतील रथ ओढण्याची परंपरा असल्याचे सांगत मोठ्या संख्येने तरुण जमा झाले व त्यांनी यात्रेतील रथ ओढण्याचा प्रयत्न केला त्यास पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी तसेच एक होमगार्ड जखमी झाले. पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या डोळ्याला आणि डोक्याला ईजा झाली. या प्रकरणात यात्रेच्या पंच कमिटीच्या सदस्यांसह जवळपास ४० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.[३५]
लातूरमधील भातांगळी शिवारातील संचारबंदी आदेश डावलून मरीआई देवीची पूजा करण्यात आली. जमलेल्या ३२ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.[३६] कोल्हापुरात तर संचारबंदी काळात घराबाहेर पडणाऱ्यात अनेक उच्चभ्रू लोकदेखील असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर खोटी माहिती दिल्याचे उघड झाले, खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर, वकील, प्राचार्य, उद्योजक, शिक्षक यांचा समावेश आहे. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.[३७]
पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांनी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत मित्रांना आमंत्रित करून इमारतीच्या गच्चीवर वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. पोलिसांनी या ठिकाणी अचानक धाड टाकून नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.[३८] १३ एप्रिलला नेरूळमधील पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉक करणारे भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह इतर १७ जणांवर साथीचे रोग अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले.[३९]
अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत असलेल्या एन ९५ प्रकाराच्या मास्कचा काळाबाजाराचा मुंबई क्राइम ब्रँचने छडा लावला. मुंबईच्या वांद्रे परिसरात २४ मार्च २०२० रोजी केलेल्या कारवाईत अंदाजे १४ कोटी रुपयांचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले.[४०] पुण्यात वाढीव दराने मास्क आणि सॅनिटायझर विकणाऱ्या चार मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या चारही मेडिकल स्टोअर्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले.[४१]
घटनाक्रम
मार्च २०२०
- ९ मार्च रोजी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. दुबईहून परतलेले एक दाम्पत्य हे कोरोना व्हायरस चाचणीमध्ये बाधित असल्याचे प्रथम निदर्शनास आले. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून ३ जणांना लागण झाली असल्याचे आढळून आले.[४२]
- ११ मार्च रोजी पुण्यातील दाम्पत्याच्या संपर्कात आलेले दोन लोक मुंबईमध्ये कोरोनाबाधित असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले.[४३] याच दिवशी अमेरिकेतून परतलेले पुण्यामध्ये आणखी ३, नागपूरमध्ये १ कोरोनाग्रस्त असल्याचे चाचणी मध्ये स्पष्ट झाले. करोना बाधितांची संख्या ११ वर पोहोचली.
- १३ मार्च रोजी नागपूरमधील बाधित व्यक्तीची पत्नी आणि त्याचा मित्र हे देखील विषाणूमुळे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेतून परतलेल्या एका व्यक्तीसह, पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा १० वर पोचला. याच दिवशी अहमदनगरमध्ये दुबईमधून परतलेल्या एका व्यक्तीलाही लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. [४४]
- १४ मार्च रोजी नागपूरमधील पहिल्या व्यक्तीबरोबर अमेरिकेला प्रवास केलेली अजून एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले.[४५] मुंबईमध्ये १ आणि जवळच्याच वाशी, कामोठे, कल्याणमध्येदेखील प्रत्येकी एक असे एकूण ४ कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. दुबईमधून परतलेल्या दोन यवतमाळच्या व्यक्ती कोरोना चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले.[४६] याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये नवीन ५ करोना बाधित रुग्ण आढळले.[४७]
- १५ मार्च रोजी रशिया आणि कझाकिस्तानला जाऊन आलेली औरंगाबादची एक महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.[४८] या दिवशी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ३२ वर पोहोचली. याच दिवशी दुबई, जपान असा प्रवास करून आलेली एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये बाधित असल्याचे स्पष्ट झाले.[४९]
- १६ मार्च रोजी मुंबईमध्ये एका तीन वर्षाच्या मुलासह महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले.[५०] यवतमाळमध्ये विलगीकरण केलेल्या एक महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले; पुण्यामधील अजून एका व्यक्तीसह या दिवशीचा आकडा ३७ वर पोहोचला.[५१]
- १७ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली.[५२] मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये चौसष्ट वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. अमेरिकेहून परत आलेल्या मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली.[५३]
- १८ मार्च रोजी विशीत असलेल्या फ्रान्स आणि नेदरलँड्स येथे जाऊन आलेल्या पुण्यातील महिलेला कोरोना बाधा असल्याचे स्पष्ट झाले.[५४] ६८ वर्षाच्या मुंबईतील महिलेला कोरोनाबाधा असल्याची स्पष्ट झाले.[५५] पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला असल्यामुळे त्या दिवशीची राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर जाऊन पोहोचली.[५६]
- १९ मार्च रोजी महाराष्ट्रात अजून तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये लंडनहून मुंबईला परतलेल्या महिला, दुबईहून परतलेल्या अहमदनगर आणि उल्हासनगर येथील दोन व्यक्ती ह्यांचा सामावेश आहे.[५७]
- २० मार्च रोजी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. ह्याच दिवशी पाच रुग्ण पूर्णतः बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले.[५८]
- २१ मार्च रोजी १२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामध्ये मुंबईमधील ८, पुण्यामधील २, कल्याण आणि यवतमाळमधील प्रत्येकी एक ह्या रुग्णांचा ह्यात समावेश आहे.[५९]
- २२ मार्च रोजी मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील दुसरा मृत्यू होता. त्यादिवशी मुंबईतील ६ आणि पुण्यातील ४ अशा १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.[६०]
- २३ मार्च रोजी फिलिपिन्सची नागरिक असलेली एक व्यक्ती मुंबईत मृत्युमुखी पडली. पण राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण मूत्रपिंडे निकामी होणे, असे निश्चित केले. मुंबईतील १३, सांगलीतील ४, ठाण्यातील ३, पुणे, वसई, सातारा येथील प्रत्येकी १ अशा १३ व्यक्तींची भर पडल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोचली.[६१]
- २४ मार्च रोजी राज्यात नवीन १० रुग्ण (मुंबईत ५, पुण्यात ३ आणि सातारा तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी १) आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या १०७ झाली.[६२] याच दिवशी युएईमधून मुंबईत आलेला अहमदाबादचा एक कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडल्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या तीनवर पोचली.[६३]
- २५ मार्च रोजी महाराष्ट्रातील बाधित रुग्णाची संख्या १२२ झाली. यात सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ५ जण आणि मुंबईतील १० जणांचा समावेश होता.[६४]
- २६ मार्च रोजी मुंबईमधील ६५ वर्षांची महिला आणि नवी मुंबईतील एक महिला अशा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.[६५] सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली. याशिवाय सांगलीतील ३ व्यक्ती आणि मुंबई, ठाणे आणि पुण्यातील प्रत्येक एक व्यक्ती यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले.[६६][६७]
- २७ मार्च रोजी विदर्भातून ५ नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.[६८] यातील ४ नागपूरमधील आणि एक गोंदिया जिल्ह्यातील होता. नंतर सांगलीतील बाधित कुटुंबाकडून लागण झालेले नवीन १२ रुग्ण नोंदवले गेले.[६९] मुंबईतील ३, ठाण्यातील २ आणि पालघरमधील १ रुग्ण धरून रुग्णाची संख्या १५३ पर्यंत पोचली.[७०]
- २८ मार्च रोजी राज्यातील अधिकाऱ्यांनी मुंबईत २२ रुग्ण, नागपूरमध्ये २ रुग्ण, आणि नवी मुंबई, पालघर आणि वसई-विरार भागातून ४ असे २२ नवीन रुग्ण आढळल्याचे सांगितले. २७ मार्च रोजी मुंबईमध्ये ८५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. हा कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात झालेला सहावा मृत्यू ठरला.[७१] पुण्यात ४ आणि जळगावमध्ये १ नवीन रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली. मुंबईमध्ये ४० वर्षीय महिलेचा आणि बुलढाण्यामध्ये ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. एकूण कोरोना बाधितांची संख्या २०३ झाली.
- ३० मार्च रोजी पुण्यात कोरोनामुळे ५२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा कोरोनामुळे झालेला पुण्यातील पहिला मृत्यू. मुंबईमध्ये ७८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईत ८, पुण्यात ५, नागपूरमध्ये २ आणि कोल्हापूर व नासिकमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केले.[७२]
- ३१ मार्च रोजी, मुंबईत ५, पुण्यात ३ आणि बुलढाण्यात २ नवीन रुग्ण आढळले. याच दिवशी मुंबईत ५९, अहमदनगरमध्ये ३, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारमध्ये प्रत्येकी ७ अशा एकूण ७२ नवीन केसेस आढळल्या.[७३][७४]
एप्रिल २०२०
- १ एप्रिल रोजी मुंबईतील नवीन ३०, पुण्यातील २ आणि बुलढाण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णासाहित महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली.[७५] धारावी, मुंबई येथील एका व्यक्तीसह कोरोनामुळे या दिवशी ४ जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या १६ वर पोहोचली.[७६]
- २ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४२३ झाली. यामध्ये मुंबई शहरातील ५४, बृहन्मुंबई विभागातील ९, पुण्यातील ८, पिंपरी चिंचवडमधील ३, अहमदनगरमधील ९, औरंगाबादमधील २, बुलढाणा, सातारा आणि उस्मानाबादमधील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला.[७७]
- ३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० पर्यंत पोहोचली. यामध्ये मुंबईतील ४३, बृहन्मुंबई विभागातील १०, पुण्यातील ९, अहमदनगरमधील ३, वाशिम आणि रत्नागिरीमधील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. या दिवशी राज्यात ६ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा २६ वर पोचला.[७८]
- ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३५ पर्यंत पोचली. यामध्ये मुंबईतील १०१, बृहन्मुंबई विभागातील २२, पुण्यातील १२, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील २, हिंगोली, नागपूर, अमरावतीमधील प्रत्येकी १ नव्याने आढळलेल्या रुग्णाचा समावेश आहे.[७९]
- ५ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईतील ८, पुण्यातील ३ आणि कल्याण, डोंबिवली आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.[८०]
- ६ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोनाचे १२० नवीन रुग्ण आढळले. आत्तापर्यंत ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात ६ एप्रिलपर्यंत १७,५६३ जणांची कोरोनासाठी चाचणी करण्यात आली. यापैकी १५,८०८ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. तर ८६८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.[८१]
- ९ एप्रिल दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या भागांत संचारबंदी कठोरपणे लागू करण्यासाठी तेथे राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या तैनात करण्यात येणार.[८२]
- १० एप्रिल बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे. त्यानुसार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना आवश्यक पीपीई किट, एन ९५ मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करणे आवश्यक.[८५]
- ११ एप्रिल परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने किमान ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी वाढवत आसल्याचे तसेच काही भागांत संचारबंदी आणखी कठोर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.[८६]
- १४ एप्रिल केंद्र सरकारने विविध राज्यात अडकलेले मजूर, यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी खास रेल्वे गाड्या सोडण्याची घोधना केली. त्यानुसार नाशिकहून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे खास गाड्या सोडण्यात आल्या.[८७]
परिणाम
शैक्षणिक क्षेत्र
शाळांमधून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ते ८ वी च्या सर्व परीक्षा रद्द केल्या व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला तसेच उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा कक्षाचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती परिस्थितीचा अभ्यास करून योग्य वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांना अहवाल सादर करेल.[८८][८९] १२ एप्रिल २०२० रोजी दहावीचा भूगोलाचा पेपर तसेच नववी आणि अकरावी परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय झाला.[९०]
आर्थिक परिणाम
५.२ लाख कोटींचे कर्ज असणाऱ्या महाराष्ट्र राज्याला करोनाच्या उद्रेकाने फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. उद्योगधंदे सुरू नसल्यामुळे राज्य सरकारला जीएसटी, मुद्रांक शुल्क मधून मिळणारा महसूल बंद झाला. वर्ष २०१९ मार्च महिन्याच्या तुलनेत २०२० मार्च महिन्याचे महसूली उत्पन्न ६०% इतके कमी झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्याला येणे असलेली १६ हजार ६५४ कोटींची जीएसटी परताव्याची रक्कम अनेक महिन्यांपासून थकबाकी असल्याचे सांगितले व सदरची रक्कम त्वरीत देण्याची मागणी केंद्राला लिहिलेल्या पत्रात केली. केंद्राकडून राज्याला देय असलेली थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन हे दोन टप्प्यांत देण्यात येणार असल्याचे माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.[९१] नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना लिहिलेल्या पत्राद्वारे राज्यावर आलेले कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यस्थेची माहीती अजित पवार यांनी कळवून याचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे अशी मागणी केली.[९२] काटकसरीचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व आमदारांच्या पगारांमध्ये एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अशी संपूर्ण एक वर्षासाठी ३० टक्क्यांनी कपात केली.[९३]
"या आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकटसुद्धा उभे राहील. आज जवळपास सर्व व्यवसाय,
कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठा होईल,
यामध्ये काही वाद नाही आणि म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचा विचार केला पाहिजे.!"
"येथून पुढचे काही दिवस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय काटकसरीने राहण्याच्या संबंधित विचार करावा लागेल.
वायफळ खर्च देखील टाळावे लागतील. काटकसरीचे धोरण आपल्याला निश्चितपणे सांभाळावे लागेल,
योग्य ती काळजी आपण सर्वांनी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल."
कृषी व्यवसाय
भारताच्या एकूण लोकसंख्येचा सुमारे ५८% हिस्सा हा शेतीवर अवलंबून आहे. करोनाच्या उद्रेकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले. लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद असल्याने तो प्रभावित झाला आहे. संचारबंदीमुळे सी व्हिटॅमिन साठी उपयोगात आणले जाणरे व तोडणीला आलेली लिंबू हे फळ देखिल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावातील शेतकऱ्याला कोरोना विषाणूमुळे शेतातच टाकून देण्याची वेळ आली.[९४] कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची निर्यात बंद झाली.[९५] पोटच्या पोरासारखी सांभाळलेली द्राक्षाच्या बागेतली द्राक्षे तोडायला मजूर नाही, बाजारात न्यायला व्यवस्था नाही म्हणून बागायतदाराने स्वतःच्या हाताने आपली बाग तोडून टाकली.[९६] संचारबंदीमुळे व नाशवंत असल्याने आंब्याचे उभे पीक समोर असताना ग्राहक नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला.[९७] कापूस, मक्याची खरेदी बंद झाल्याने विक्रीअभावी घरात पडून असलेल्या कापसात पिसवा झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले. ठिबक सिंचनाद्वारे टरबूज, काकडी, टोमॅटो आदी पिके घेतली जातात, त्यासाठी मोठा खर्च केला जातो. ही पिके निघण्याच्या काळातच करोनाची साथ पसरल्याने शेतात तोडणीअभावी खराब झाली.[९८]
पोल्ट्री उद्योग
महाराष्ट्रात ब्रॉयलर चिकनची एका दिवसासाठीची मागणी ही अंदाजे २८०० टन एवढी आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावरून पसरली, या अफवेमुळे महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला. कोल्हापूरमध्ये सेल लावून कोंबड्यांची विक्री केली गेली अवघ्या १०० रुपयांमध्ये ५ कोंबड्या विकल्या गेल्या.[९९] पालघरमधील एका उद्योजकाने नऊ लाख अंडी, दीड लाख पिल्ले आणि एक लाख कोंबड्या जमिनीत पुरुन त्याची विल्हेवाट लावली.[१००] केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांनी जनजागृती केली. कुक्कुट पक्षी किंवा कुक्कुट उत्पादनं यांचा कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी अशाप्रकारे अफवांकडे दुर्लक्ष करावे अशा आशयाचे परिपत्रक महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने काढले. ५५ डिग्री सेल्सिअसच्या वर अन्न शिजवल्यास, त्यात कुठलाही विषाणू शिल्लक राहत नसल्याने कोरोनाच्या भीतीने मांसाहार टाळण्याची काहीही आवश्यकता नसल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.[१०१]
वाहन उद्योग
करोनाच्या उद्रेकाचा महाराष्ट्रातील वाहन उत्पादन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. बजाज ऑटो कंपनीने आपले आकुर्डी आणि चाकण येथील कारखाने ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. टाटा मोटर्सने देखील पुण्यामधील उत्पादन कमी केल्याचे जाहीर केले. अशोक लेलँडने ठाणे आणि आईशर मोटर्सने भंडारा येथील सुटे भाग तयार करणारे कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केली. मर्सिडीज बेन्झ कंपनीने चाकण येथील कारखाना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. फियाट, फोर्स मोटर्स आणि जेसीबी कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केली. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने देखील २३ मार्च रोजी त्यांचे कांदिवली, नागपूर आणि चाकण येथील कारखाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.[१०२][१०३]
१७ मार्चच्या एका अहवालानुसार कोरोना विषाणू उद्रेकामुळे, मुंबईमधील सेवा क्षेत्राचे दर महिना कमीत कमी १६००० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. परदेशी प्रवासांच्या न येण्याने मुंबई शहराचे अंदाजे २२०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.[१०४] कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मुंबईमधील मनोरंजन उद्योगालाही मोठा फटका बसणार आहे. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याने, या उद्योगाशी निगडीत अनेक कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत. बॉलीवुड चित्रपट व्यवसायाचे लॉकडाऊनमुळे अंदाजे १३०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होण्याचा अंदाज आहे.[१०५]३० मार्च रोजी, कोरोना विषाणूच्या उद्रेकाची झळ कमी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वीज बिलात पुढच्या ५ वर्षाकरिता ८% कपात जाहीर केली.[१०६]राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून आलेल्या सर्व जनप्रतिनिधींच्या (विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री) मार्चच्या पगारात ६०% कपात केले असल्याचे जाहीर केले.[१०७]
पर्यटन व्यवसाय
पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे.[१०८] हॉटेल, भाड्याच्या गाड्या घेऊन प्रवास करणाऱ्यांनी आपले प्रवास रद्द केले आहेत.[१०९] रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर राज्य सरकारने अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीचे मंदिर, पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपती, शिर्डीतील साईबाबा मंदिर यांसह अनेक मोठ्या यात्रास्थळांचा समावेश आहे.[११०][१११] मुंबई पोलिस यांनी शहरात येणाऱ्या सगळ्या सहली ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या.[११२] तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली.[११३] मध्य प्रदेश सरकारने आपल्या इंदूर आणि महाराष्ट्रादरम्यानच्या बस सेवाही ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या.[११४]
अफवा व चुकीची माहिती
करोना पसरत असताना जनतेला भयभीत करणारे खोडसाळ संदेश, कोरोनाच्या उपचाराबाबत नसलेली संशोधने, चुकीची माहिती, अशास्त्रीय उपचार सांगून संभ्रमित करणारे संदेश, धार्मिक तेढ निर्माण होवू शकणारे संदेश समाजमाध्यमातून पसरविण्यात आले. गोमूत्र, गायीचे शेण खाल्ल्याने कोरोना पळून जाईल.[११५] महिन्यातील सर्वात काळा दिन म्हणजे अमावस्येच्या दिवशी, रविवारी जनता संचारबंदी संपल्यानंतर लोकांनी शंखनाद करीत टाळ्या वाजवल्याने कोरोना विषाणूची मारक क्षमता कमी झाली असल्याचा संदेश अभिनेता अमिताभ बच्चन यांनी समाजमाध्यमात दिला. समाजमाध्यमातून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपला संदेश मागे घेतला.[११६][११७] समाजातील मुसलमान व्यक्ती भाजी मंडईत विक्री करताना आढळली, तर त्यांच्याकडून काही खरेदी करू नका. तसेच, त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाचा संदेश व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यात पसरवण्यात आला. जनमानसात अशाने द्वेष निर्माण होऊन, जातीय एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता पाहून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसह ग्रुप मधील सदस्यावर गुन्हा दाखल केला.[११८] हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये दोन मुठी कापूर टाकला तर आजूबाजूच्या सर्व भागांतून करोना व्हायरसचा नायनाट होईल असे सांगितले गेले.[११९]
सांख्यिकी
महाराष्ट्रातील रुग्णांची जिल्हानिहाय माहिती
जिल्हे | एकूण रुग्ण | बरे झालेले रुग्ण | मृत्यू | नोंदी |
---|---|---|---|---|
मुंबई + बृहन्मुंबई[a] | १५,७४७ | २७३९ | ५९६ | |
ठाणे | ३,९६५ | ५७८ | २५ | |
पालघर | ३२६ | ११८ | १३ | |
रायगड | ३०८ | ९८ | १० | |
बृहन्मुंबई विभागात एकूण | १९,४६६ | ३५३३ | ६४४ | |
पुणे | ३१६१ | ११९७ | १७० | |
सांगली | ४१ | २८ | १ | |
अहमदनगर | ६४ | ३५ | ३ | |
नागपूर | ३१७ | ८६ | २ | |
लातूर | ३२ | ११ | १ | |
बुलढाणा | २५ | २३ | १ | |
यवतमाळ | ९९ | ५० | ० | |
औरंगाबाद | ६८० | १४० | १७ | |
उस्मानाबाद | ४ | ३ | ० | |
सातारा | १२५ | ३३ | २ | |
कोल्हापूर | २२ | ८ | १ | |
रत्नागिरी | ६० | ५ | ३ | |
जळगाव | २०६ | २९ | २६ | |
अमरावती | ८९ | ५६ | १३ | |
गोंदिया | १ | १ | ० | |
हिंगोली | ६१ | ४५ | ० | |
नाशिक | ७५१ | १२६ | ३४ | |
सिंधुदुर्ग | ७ | २ | ० | |
वाशिम | ३ | १ | ० | |
जालना | १६ | १ | ० | |
अकोला | १९२ | ५५ | १२ | |
बीड | १ | १ | ० | |
धुळे | ७१ | १९ | ६ | |
सोलापूर | ३२० | ४७ | २१ | |
चंद्रपूर | ४ | २ | ० | |
परभणी | २ | १ | १ | |
नांदेड | ५७ | ० | ४ | |
नंदुरबार | २२ | ९ | २ | |
वर्धा | १ | ० | १ | |
भंडारा | १ | ० | ० | |
इतर राज्यातील | ४१ | ० | १० | |
एकूण (सर्व जिल्हे) | २५,९२२ | ५,५४७ | ९७५ | |
‡ पनवेल ( रायगड जिल्ह्यातील)येथील रुग्णांचा समावेश आहे | ||||
१३ मे २०२० च्या माहितीनुसार. स्रोत: arogya.maharashtra.gov.in, Public Health Department, Maharashtra आणि बातम्या |
आलेख
Total confirmed cases Active Cases Recoveries Deaths
रोजचे नवीन रुग्ण
रोज बरे झालेले रुग्णांची संख्या
रोजची मृत्यू संख्या
बाह्य दुवे
- कोविड-१९ (कोरोना) माहिती पुस्तिका (मराठी मजकूर)
- मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) (मराठी मजकूर)
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग (मराठी मजकूर)
- आरोग्य मंत्रालय भारत सरकार (अधिकृत संकेतस्थळ) (इंग्रजी मजकूर)
- जागतिक आरोग्य संघटना (अधिकृत संकेतस्थळ) (इंग्रजी मजकूर)