भारतीय जनता पक्ष
भारतीय जनता पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | जगत प्रकाश नड्डा |
सचिव | बी.एल. संतोष |
संसदेमधील पक्षाध्यक्ष | नरेंद्र मोदी (पंतप्रधान) |
लोकसभेमधील पक्षनेता | नरेंद्र मोदी (पंतप्रधान) |
राज्यसभेमधील पक्षनेता | पीयूष गोयल (केंद्रीय मंत्री) |
स्थापना | ६ एप्रिल १९८० |
मुख्यालय | ६ए, दीनदयाल उपाध्याय मार्ग, दिल्ली |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
लोकसभेमधील जागा | ३०३/५४३ |
राज्यसभेमधील जागा | ९३/२४५ (सध्या २३३ सदस्य + १२ नामांकित) |
राजकीय तत्त्वे |
|
प्रकाशने | कमल संदेश |
संकेतस्थळ | भाजप |
भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत.
इतिहास
भारतीय जनसंघ (१९५१-७७)
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
भारतीय जनता पार्टी(पक्ष) (१९८०-चालू)
जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता.
कटिबद्धता
पक्षाच्या घटनेनुसार.[५] सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे.
पक्षांतर्गत संरचना
या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही.
मार्गदर्शक मंडळ
भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.[६] या मंडळातील सद्य सदस्य
नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज
भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.:ज्यात अमित शहा हे चेरमन, अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्य (सन २०२०) :
- नरेंद्र मोदी
- राजनाथ सिंह
- वेंकय्या नायडू
- नितीन गडकरी
- थॅंवरचंद गेहलोत
- शिवराजसिंग चौहान
- जे.पी. नड्डा
- रामलाल
नॅशनल काऊन्सिल
भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो.
सेंट्रल इलेक्शन कमिशन
या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
डिसिप्लिनरी कमिटी
पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
नॅशनल सेल्स
याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.
पक्षाध्यक्ष
क्र. | कार्यकाळ | पक्षाध्यक्ष | राज्य | संदर्भ | |
---|---|---|---|---|---|
१ | १९८०–८६ | अटलबिहारी वाजपेयी | मध्य प्रदेश | [७] | |
२ | १९८६–९१ | लालकृष्ण अडवाणी | गुजरात | [७] | |
३ | १९९१–९३ | मुरली मनोहर जोशी | उत्तर प्रदेश | [८] | |
(२) | १९९३–९८ | लालकृष्ण अडवाणी | गुजरात | [७] | |
४ | १९९८–२००० | कुशाभाऊ ठाकरे | मध्य प्रदेश | [९] | |
५ | २०००–०१ | बंगारू लक्ष्मण | तेलंगणा | [१०] | |
५ | २००१–०२ | के. जन कृष्णमूर्ती | तमिळनाडू | [११] | |
६ | २००२–०४ | व्यंकय्या नायडू | आंध्र प्रदेश | [१२] | |
(२) | २००४–०६ | लालकृष्ण अडवाणी | गुजरात | [१३] | |
७ | २००६–०९ | राजनाथ सिंह | उत्तर प्रदेश | [१४] | |
८ | २००९–१३ | नितीन गडकरी | महाराष्ट्र | [१५] | |
(७) | २०१३–१४ | राजनाथ सिंह | उत्तर प्रदेश | [१६] | |
९ | २०१४–२० | अमित शाह | गुजरात | [१७] | |
१० | २०२०- पदस्थ | जगत प्रकाश नड्डा | हिमाचल प्रदेश | [१८] |
अन्य महत्त्वाचे नेते
- नरेंद्र मोदी
- जसवंत सिंह
- लालजी टंडन
- यशवंत सिन्हा
- सुषमा स्वराज (दिवंगत)
- प्रमोद महाजन (दिवंगत)
- नितीन गडकरी
- उमा भारती
- अरुण जेटली
- प्रकाश जावडेकर (विद्यमान प्रवक्ता)
- कल्याण सिंह
- अरुण शौरी
- गोपीनाथ मुंडे (दिवंगत)
- राजीवप्रताप रूडी
- साहिबसिंह वर्मा
- वसुंधराराजे शिंदे
- बाबूलाल गौड
- मदनलाल खुराणा
- स्मृती इराणी
- चंद्रकांत बच्चू पाटील
- देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षातील गुन्हा दाखल असलेले नेते
- उत्तमराव इंगळे (उमरखेडचे माजी आमदार) : खंडणीखोरीचा गुन्हा -
उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल.
- कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ) : क्रीडा घोटाळा -
इ.स.२००२ मध्ये नागपूर महानगरपालिकेतील दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.
- जयकुमार रावल (महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन मंत्री : आर्थिक घोटाळे -
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बँक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बँकेतून नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज घेतले. कर्ज घेणाऱ्यांत जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बँकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.
- दिलीप गांधी (खासदार, दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, नगर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष) : कर्जवाटप व सोनेतारण गैरव्यवहारासंबंधी गुन्हा –
बँकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्र्ह बँकेकडून या बँकेला पाच लाख रुपयांचा दंड.
- दीपक (बाबा) मिसाळ (सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर) : खुनाचा प्रयत्न, धमक्या -
२००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निर्दोष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या (२०१९ साली) या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.
- पवन पवार (नाशिक महानगरपालिकेतला नगरसेवक) : पोलिसाचा खून आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असणारा नगरसेवक.
पवन पवारवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत, पैकी काही हे -
- नाशिक रोड भागात पवारची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
- व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर आहेत.
- मध्यंतरी पोलिसांनी त्याला तडीपारही केले होते. दीड महिन्यापूर्वी पवारच्या संपर्क कार्यालयात तडीपार गुंडाला आश्रय दिल्याचे उघड झाले. त्या प्रकरणातही त्याला अटक झाली.
- प्रकाश मेहता (महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री) : झोपडी पुनर्वसनाच्या कामामध्ये केलेला भ्रष्टाचार -
मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे.
- प्रवीण दरेकर (महाराष्ट्र विधानपरिषदेतील आमदार व विरोधी पक्षनेते) : बँक घोटाळा -
मुंबई बँकेत १९९८पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बँकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.
- बबनराव पाचपुते : (श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : शेतकऱ्यांची देणी बुडवणे व बँकेची कर्जे न फेडणे : -
बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष असलेले विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी साखर कारखान्यावर (श्रीगोंदा) शिरूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे शाखेकडून कारखान्यावर बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई झाली आहे. भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखाना १-१०-२०१६ रोजी पंजाब नॅशनल बँकेकडून तत्त्वत: ताब्यात घेण्यात आला. नगर जिल्हय़ातील श्रीगोंदा तालुक्यामधील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने ऊस देयकांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बँकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्त्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बँकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला दैवदैठणचा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे.
- रवींद्र चव्हाण (महाराष्ट्र राज्य -माजी राज्यमंत्री) : १९ गुन्हे, तीन ते सात वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे -
गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. काँग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे याच्या समर्थकांना मारहाण केल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३. विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण, मारहाण, अॅट्रॉसिटी यांचा समावेश.
- राम कदम (महाराष्ट्र विधानसभेतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : मारहाण, धमक्या, अपहरण -
शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर (घाटकोपर-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.
- रामदास तडस (वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार) : आर्थिक गैरव्यवहार -
देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता.
- विकास कुंभारे (मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : क्रीडा घोटाळा -
नागपूर महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट. - विजयकुमार गावित (महाराष्ट्रातील नंदूरबार विधानसभा मतदारसंघांतून]] निवडून गेलेले आमदार, महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री) : भ्रष्टाचार, फसवणूक -
संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजनेत भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.
- शिवाजी कर्डिले : (राहुरीविधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार) : फसवणूकाबद्दल व शस्त्रास्त्रासंबंधी गुन्हा केल्याचा आरोप -
एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२० खाली गुन्हा दाखल; शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक झाली होती. सध्या खटला सुरू. शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्यात पंधरा महिन्यांची शिक्षा.
- संभाजी पाटील निलंगेकर (महाराष्ट्र राज्य कामगारमंत्री) : आर्थिक गैरव्यवहार -
मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रुपये कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बँकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधीकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.
- भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूरचा भाजप आमदार आकाश विजयवर्गीय याच्यावर २३ जून २०१९ रोजी [[इंदूर
महानगरपालिका|इंदूर महानगरपालिकेच्या]] अधिकाऱ्याच्या डोक्यात काठी मारून गंभीर जखमी केल्याचा आरोप. आकाशला सोडवण्यासाठी तमाम भाजप कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी मोर्चे काढून व दंगली माजवून निदर्शने केली. आरोपी जामिनावर मोकळा. पालिका अधिकाऱ्याची अवस्था गंभीर.
पक्षाचे चिन्ह
जनसंघाचे अधिकृत निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी हे होते. ते आता भाजपच्या काळात कमळ असे झाले आहे.
लोकसभेतील प्राप्त जागा आणि परिणाम
वर्ष | विधिमंडळ | पक्ष नेता | प्राप्त जागा | फरक | मतांची टक्केवारी | फरक | परिणाम | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१९८४ | ८वी लोकसभा | अटल बिहारी वाजपेयी | २ / ५४३ | ▲ २ | ७.७४% | – | विपक्ष | [१९] |
१९८९ | ९वी लोकसभा | लालकृष्ण अडवाणी | ८५ / ५४३ | ▲ ८३ | ११.३६% | ▲ ३.६२% | बाहेरून पाठिंबा (रा.लो.आ.) | [२०] |
१९९१ | १०वी लोकसभा | १२० / ५४३ | ▲ ३५ | २०.११% | ▲ ८.७५% | विपक्ष | [२१] | |
१९९६ | ११वी लोकसभा | अटल बिहारी वाजपेयी | १६१ / ५४३ | ▲ ४१ | २०.२९% | ▲ ०.१८% | सत्ता, परत विपक्ष | [२२] |
१९९८ | १२वी लोकसभा | १८२ / ५४३ | ▲ २१ | २५.५९% | ▲ ५.३०% | सत्ता | [२३] | |
१९९९ | १३वी लोकसभा | १८२ / ५४३ | ▬ | २३.७५% | ▼ १.८४% | सत्ता | [२४] | |
२००४ | १४वी लोकसभा | १३८ / ५४३ | ▼ ४४ | २२.१६% | ▼ १.६९% | विपक्ष | [२५] | |
२००९ | १५वी लोकसभा | लालकृष्ण अडवाणी | ११६ / ५४३ | ▼ २२ | १८.८०% | ▼ ३.३६% | विपक्ष | [२६] |
२०१४ | १६वी लोकसभा | नरेंद्र मोदी | २८२ / ५४३ | ▲ १६६ | ३१.३४% | ▲ १२.५४% | सत्ता | [२७] |
२०१९ | १७वी लोकसभा | ३०३ / ५४३ | ▲ २१ | ३७.४६% | ▲ ६.१२% | सत्ता | [२८][२९] |
भाजपच्या उदयावरील पुस्तके
- शेड्स ऑफ सॅफ्रन (इंग्रजी लेखक : सबा नक्वी; मराठी अनुवाद - 'भगव्याच्या छटा : वाजपेयी ते मोदी', अनुवादक - सुश्रुत कुलकर्णी)
- भाजपचे निखळलेले तारे (विद्याधर ठाणेकर)
हेसुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-03-12 at the Wayback Machine.
- ... आणि कमळ उमलले! : लोकसभा २०१४ च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत प्राप्त केदार लेले (लंडन) loksatta.com